माणुसकी

माणुसकी

नमस्कार,
       मी गेला काही कालावधी निदान फेसबुक वर आहे.  मी काही खूप व्यासंगी नाही, विद्वान तर मुळीच नाही.  मी कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या विचारांचा निष्ठावंत वगैरे ही नाही. पण, मी वाचक मात्र आहे, पूर्वीपासून. अगदी छानछान गोष्टिंपासून चांदोबा व नंतर चित्रलेखा सोबतच  वर्तमानपत्रे आणि रीडर्स डाजेस्ट इ. काही वेळा उपलब्ध पुस्तके कधी ग्रंथालयातून कधी विकत घेऊन.  असा माझा वाचन प्रवास सुरू आहेच. किडूक मिडूक लिहिण्याचेही तसे कधी काळी सुरू होते. हल्ली थोडे लिखाण होते आहे.  तशी गुर्मी वगैरे येण्याइतकेही काही मोठे काम नाहीच नाही.
        हे सर्व व्यक्त करण्याचा मुद्दा इतकाच की मला खूप काही शिकवले ह्या सोशल मीडियाने.  सर्व काही इथे  लख्ख प्रकाशाइतके स्वच्छ दिसत असताना कुणीही अधिक काळ खोट्याला बळी पडून राहूच कसा शकतो?  काल जे खरे म्हणून ओरडून ओरडून बोलले आज त्यांचे खोटे पुराव्यानिशी खोटे सिद्ध
झाले. तरी ही काही मूर्ख लोक पाशवी अहंकारात ते कालचेच खरे असे आजही रेटून बोलतात . तर काही अर्धवट लोक तिसराच अर्थ काडून वेगळीच दिशा पकडतात. अगदी काही लोक सोडता जास्त लोक तर तीच टिमकी नी तेच तुणतुणे ताल धरून, फेर धरून वाजवत राहतात. बाकी दुसरी बाजू त्यांना ऐकूनच घ्यायची नसते म्हणजे त्यांचे काहीतरी साटेलोटे असते असे दिसते. अन्यथा झोपलेला माणूस कधीतरी जागा होतोच की पण इकडे तसे घडताना दिसत नाही. आणि काहींवर त्यांच्या विचारांचा वा प्रचाराचा प्रभाव दिसतो. खरे ते खोटे मानायचे व त्या बद्दल सतत बोलत राहायचे जेणेकरून लोकांना तेच खरे वाटून आणखी मतपरिवर्तन घडविता येईल हेच कायते त्यांचे इप्सित कर्तव्य.
किती अर्थहीन किती दिशाहीन?  मग कुणीही कुठेही हाकून नेणार नाही तर काय होईल ह्यांचे ?.पण यात होरपळते सामान्य कष्टकरी जनता. त्यांच्यातीलच थोडे बरे पाहून त्यांचेच आयुष्य उध्वस्थ करायला निवडले जातात,  तेही आपसात विष पेरून, अगदी बेमालूमपणे .. अगदी क्रूर, नराधमालाच शोभतील वा त्याही पलीकडचे असे षडयंत्र रचले जाते. वखेळ केला जातो.  नाहक बळी जातात सामान्य व सामान्यांसाठी  झटणारे हात. आणि मग काही काळ त्यांच्यावर चिखलफेक केली जाते गेलेल्यांवरही, पद्धतशीरपणे. तरीही जनक्षोभ ओसरत नाहीसे पाहून, हळूच केले जाते त्यांचे दैवती करण. आणि उभी राहतात त्यांच्या सदगुणांची मंदिरे हळू हळू.  त्यांची पूजा बांधली जाते मग. मात्र पूजा परंपरा हक्क वगैरे एक एक करत हळू हळू पुन्हा एकदा त्यांचे जिवितकार्यावर बोळा फिरविण्याचे कार्य सुरू राहते अव्याहत.
हे सर्व काही सामान्य माणसाला अनुभवाने समजत जाते त्या साठी कसलेच शिक्षण घेणे नकोच. मग हे लोक असे का वागताहेत ? ह्या प्रश्नाचे ही उत्तर वर आलेच आहे पण ह्यांचे मत परिवर्तन कधीच होत नसते का ? असा भाबडा प्रश्नमाझ्या मनाला सतावतो आहे.  त्याचे उत्तर "बहुधा नाहीच" येते तरी मग पुढे जोडप्रश्न उमटतो  "पण का ,का ?"
......इतके पराकोटीचे निगरगट्ट असतात हे लोक ...?
हंमम असो ..
ते त्यांचे स्वार्थ प्रेरित कार्य करतात तर ..
मग आपणही आपले करत राहावे .. कदाचित आपला मार्ग हा माणुसकीच्या वाटेवरून जाणारा असेल व त्यांचा मार्ग माणुसकीला तुडवून जाणारा असेल हाच काय तो फरक ... आपण प्रयत्न करत राहू...
   ©अँब्रोस चेट्टियार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी